रायगड - बैलगाडी शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनारी अधूनमधून बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जाते. 2 दिवसांपूर्वी झालेल्या शर्यतीप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अलिबाग तालुक्याला बैलगाडी शर्यतींची मोठी परंपरा आहे. पूर्वी दरवर्षी ठिकठिकाणी भरघोस बक्षिसांच्या स्पर्धांचे आयोजन केले जात असे. अलिबागमधील महादेव कोळी समाजातर्फे धुलिवंदनानिमित्त दरवर्षी होणाऱ्या स्पर्धा खूप प्रसिद्ध होत्या. या स्पर्धेला मोठी बक्षिसही ठेवली जात. परंतु, 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या शर्यतींवर बंदी घातली. त्यानंतर शर्यतींना परवानगी मिळावी, अशी स्थानिकांचीही मागणी आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे आता गुपचूप या स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि त्यासाठी मोजक्याच गाडीवानांना या स्पर्धेसाठी आमंत्रित केले जाते. याची फारशी कुठे वाच्यता किंवा गवगवा केला जात नाही.
किहीम येथील शर्यतींबाबत आवाज फाऊंडेशनने केली तक्रार
अशाच प्रकारच्या शर्यती दोन दिवसांपूर्वी किहीमच्या किनाऱ्यावर आयोजित केल्या होत्या. आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सुमायरा अब्दुल अली यांनी या शर्यतींचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि त्याची तक्रार रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली. आता मांडवा सागरी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात गाडीवानांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राण्यांना निर्दयीपणाची वागणूक दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मांडवा सागरी पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. मात्र, या संदर्भात स्थानिकांकडे विचारणा केली असता अशा कुठल्याही स्पर्धा किंवा शर्यती होत नाहीत. बैलांना सरावासाठी आणले जाते. सरकारी अटी-शर्तींवर का होईना बैलगाडी शर्यती या पुन्हा सुरू केल्या पाहिजेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.