रायगड - मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडीजवळ एसटी बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असून तीघे गंभीर जखमी आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागोठाणेकडून मुबईकडे जाणारी प्रवासी चारचाकी वाहन मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी गावाच्या हद्दीत आली असता समोरून येणाऱ्या एसटीने जोरदार धडक दिली. हा अपघात आज रविवार (दि. 19 जाने.) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमरास घडला. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
हेही वाचा - रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध
या अपघातात संतोष दयाराम भोनकर (वय 41 वर्षे,रा.धोबिघाट), संतोष सीताराम साखरकर (वय 42 वर्षे, रा.मानखुर्द), चांदोरकर (वय 40 वर्षे) हे जागीच ठार झाले. तर एकाला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचे नाव समजू शकले नाही. या अपघातात एकूण चार जण ठार असून, अन्य 3 जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
या अपघाताबाबत वडखळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - चालकांच्या आंदोलनामुळे रायगडमधील 108 रुग्णवाहिका सेवा ठप्प