रायगड - जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे, महाड, नागोठणे, रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंड आणि ताम्हणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेत.
हेही वाचा - पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील 72 तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ऐन गणेशोत्सव काळात पुन्हा जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरड कोसळल्याने माणगाव-पुणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर, माणगाव-श्रीवर्धन मार्गावरील मोर्बे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, मुरुड-भालगाव रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंड आणि ताम्हणी घाटात दरड कोसळली असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणा ढिगारा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा - माळीणची ५ वर्ष : दरड नव्हे...डोंगरच कोसळला अन् होत्याचे नव्हते झाले
महाड शहरातील सुकट गल्ली, दस्तुरी नाका, रायगड रोड, बाजारपेठ या भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. नागोठणेत अंबा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने नागोठणे बस स्थानक, बाजरपेठ भागात पाणी साचले आहे. रोह्यात वरसे ग्रामपंचायत हद्दीतही नाले तुडूंब भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.