रायगड - आधी अतिवृष्टी त्यानंतर चक्रीवादळ आणि आता कोरोनाचा फटका यामुळे मासेमारीला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. शासनाने कोरोनाच्या काळात मच्छीमारी करण्यास परवानगी दिली असली, तरीही मासळी बाजार बंद असल्याने मासळीला भाव नाही. यामुळे कोळी बांधव आर्थिक संकटात आहे. मच्छीला उठाव नसल्याने मच्छीमारांच्या हजारो बोटी समुद्र किनारी उभ्या आहेत. तसेच डिझेलचा परतावाही मिळाला नसल्याने त्याच्या संकटात भर पडलीय. मासेमारीच बंद केल्याने बोटींवरील कामगारांचा आर्थिक भारही बोट मालकांवर पडत आहे. यामुळे शासनाने अडचणीच्या काळात सहकार्य करावे, अशी मागणी कोळी बांधवाकडून होत आहे.
लॉकडाऊन असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. तसेच मासळी बाजारात आणल्यानंतर त्याला भाव मिळत नसल्याने मच्छिमारांचे हाल होत आहेत. सध्या हॉटेल बंद असल्याने त्याचाही फटका मासेमारीला बसलाय. मच्छी पकडून आणणाऱ्या बोटींचा डिझेल खर्चही भागत नसल्याने परवानगी असतानाही त्यांनी हजारो बोटी समुद्रकिनारी नांगरून ठेवल्या आहेत. तसेच बोटीवर असणाऱ्या कामगारांच्या खाण्यापिण्याचा खर्चदेखील कोळी बांधवांनाच सहन करावा लागत आहे. मोठ्या मच्छीमारांपेक्षा हातावर कमवणाऱ्या कोळी बांधवाची आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे.
मासेमारी करण्यासाठी फक्त दोन महिने हातात उरले असताना कोरोनामुळे हे उरलेले महिनेही हातातून जाणार असल्याने त्यांच्यावरील संकट बळावले आहे. आधीच अतिवृष्टी, चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर सवरलेला कोळी बांधव कोरोनाच्या संकटाने पूर्ण उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कोळी बांधवांनाही शासनाने आर्थिक तसेच खाण्यापिण्याची मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागलीय.