बारामती (पुणे) - तालुक्यात झालेली जलसंधारणाची कामे आणि त्याला वरूणराजाची मिळाली साथ, यामुळे यंदा बारामती तालुक्याचा पाणीटंचाई आराखडा तब्बल ५० टक्क्यांनी घटला आहे. तालुक्याच्या १ कोटी ५८ लाखांच्या टंचाई आराखड्याला जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे यंदा तालुक्याला दुष्काळाची झळ जाणवायची शक्यता कमी आहे.
विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातून जलसंधारणाची कामे -
उन्हाळा म्हटल की बारामती तालुक्याच्या जिरायती भागाची तहान टँकरच्या पाण्यावर भागवावी लागते. अगदी जानेवारी महिन्यापासून जिरायती भागातील दुष्काळी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. परंतू मागील काही वर्षांमध्ये जिरायती भागात प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातून जलसंधारणाची प्रचंड कामे झाली आहेत. ओढा खोलीकरण, पाझर तलाव, वळण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव या माध्यमातून तालुक्यात जलसाक्षरता मोठ्याप्रमाणात झाली. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४२४.९ मिलीमीटर एवढे आहे. मागील वर्षी पावसाने ही सरासरी ओलांडत विक्रमी आकडा गाठला.
१ कोटी ११ लाखांच्या निधीला मंजुरी -
मागील वर्षी तालुक्यात तब्बल ६०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यातील सर्वच जलस्त्रोतांमध्ये ९१३.६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला. पाऊस आणि झालेल्या पाणीसाठ्यामुळे प्रथमच टंचाई आराखड्यात ५० टक्क्यांनी घट झाली. जानेवारी-मार्चच्या दरम्यान तालुक्यातील २१ कामांना १ कोटी ११ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तर गरज भासल्यास एप्रिल-जून दरम्यान टँकर सुरू करण्यात येतील, असे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
तालुक्यात जलसंधारणाची मोठी कामे -
तालुक्यात विविध स्वयंसेवी संस्था व शासकिय विभागांच्या माध्यामातून जलसंधारणाची मोठी कामे झाली. तसेच ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अजूनपर्यंत तालुक्यातील ओढ्यांना पाणी आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात टंचाई जास्तप्रमाणत जाणवनार नाही, अशी बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा - मुख्यमंत्री देशावर बोलले पण महाराष्ट्रावर चकार शब्द काढला नाही - देवेंद्र फडणवीस