पुणे : पुणे शहरासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईनच घ्या, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. पुण्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबाहेर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत ही मागणी केली आहे.
कोरोना झाल्यावर शिक्षणमंत्री जबाबदारी घेणार का ?
येत्या 29 एप्रिलला दहावी, तर 23 एप्रिलपासून बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरू होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होतील हे बोर्डाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, परीक्षा काळात जर कोरोना झाला आणि विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या घरी संसर्ग वाढला तर शिक्षणमंत्री जबाबदारी घेणार का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील बोर्डाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यी एकत्र आले होते. यावेळी त्यांनी ऑफलाईन परीक्षेचा निषेध नोंदवला.
आम्हाला कोरोनाची खूप भीती
पुणे शहरासह राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आम्हा विध्यार्थ्यांना कोरोनाची खूप भीती वाटत आहे. आमच्या बरोबर घरच्यांनाही याची भीती वाटत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या आधीच सांगितलंय, की विद्यार्थ्यांना त्याच्या जबाबदारीवर परीक्षा द्यावी लागणार आहे. उद्या जर आम्हाला काही झालं तर याला जबाबदार कोण? म्हणून आमच्या परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.
वर्षभर ऑनलाईन शिक्षण, मग आता परीक्षा ऑनलाईन का ?
कोरोनाच्या काळात सर्वच शालेय शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. वर्षभर आम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवलं आणि आता परीक्षा ऑनलाईन पद्धतीने का घेत नाही? जर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आम्हा विद्यार्थ्यांची जबाबदारी घेत असतील तर आम्ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देऊ, असेही यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटले.
हेही वाचा - नागपूर महापौर दयाशंकर तिवारींना कोरोना
हेही वाचा - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, 'या' तारखेपासून मिळणार हॉल तिकिट