पुणे- देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना लॉकडाऊन कडक करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत नसल्याने भिमाशंकर परिसरातील आदिवासी कुटुंबांची चिंता वाढली होती. खेड तहसीलदार सुचित्रा आमले यांनी मदतीचा हात पुढे करत भिमाशंकर परिसरातील येळवली २२ आणि पदरवाडी येथील १४ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे किट स्वखर्चातून दिले आहे.
आळंदी, चाकण व राजगुरुनगर शहरातील वाढते शहरीकरण व मोठ्या संख्येने असणारा कामगार वर्ग लॉकडाऊनच्या काळात उपाशी झोपू नये, यासाठी प्रशासन, पोलीस दिवसरात्र मेहनत घेत असुन दानशुर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरु आहे. मात्र, खेड तहसीलदार सुचित्रा आमले यांनी वैयक्तिक पातळीवर आदिवासी भागातील आदिवासी बांधव, कातकरी, मजूर उपाशी झोपू नये यासाठी स्वखर्चातुन जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप केले आहे. दानशुर व्यक्तींना त्यांनी मदतीचा हात कमी पडु देऊ नका, असेही आवाहन केले आहे.
पुणे व मुंबई येथेन अनेक नागरिक भिमाशंकर परिसरातील गावांमध्ये आले आहेत. प्रशासनाने त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. नागरिकांनी कामाच्या व्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या परिसरातील पेट्रोल पंपानी अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना पेट्रोल डिझेलची विक्री करण्यावर तहसीलदार आमले यांनी भेट देऊन निर्बंध घातले आहेत.