पुणे - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे कपडे व्यावसायिक आणि मालकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले, अशी जाहिरात दिलेला भारतातील सर्वात मोठा 'गारमेंट सेल' स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करून बंद केला आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे 26 फेब्रुवारीपासून हा 'गारमेंट सेल' सुरू होता.
'दिल्लीत सतत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे कपडे व्यावसायिक आणि मालकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर दरवर्षी 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दिवशी लागणारे भारतातील सर्वात मोठे कपड्यांचे प्रदर्शन यंदा पुण्यात होत आहे,' अशी जाहिरात प्रसिद्ध वर्तमानपत्रात दिली होती. याचा निषेध करण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे या कपड्यांच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी जाऊन तीव्र आंदोलन करण्यात आले आणि हे प्रदर्शन बंद करण्यात आले आहे. या वेळी, आंदोलकांना आणि 'गारमेंट सेल'च्या लोकांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतले.
![Pune Swabhimani Shetkari Sanghatana News](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10811567_797_10811567_1614503445025.png)
दिल्लीत तिन्ही कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या गारमेंट सेलने शेतकरी आंदोलनाची बदनामी करून स्वतःचा माल खपवण्यासाठी जाहिरात दिली आहे. 'ज्या शेतकऱ्यांचे अन्न खातात, त्यांच्याच विरोधात जाहिरात देऊन धंदा करतात. हा गारमेंट सेल बंद करण्यात यावा, यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. याचा निषेध करत गारमेंट सेलवाल्यांनी माफीचे पत्र लिहून द्यावे, अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी यावेळी केली.
'गारमेंट सेल'ने दिले माफीचे पत्र
शेतकरी कायद्यांविरोधात जाहिरात दिलेल्या कपड्यांच्या प्रदर्शनाच्या आयोजकांनी स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन शेतकरी आंदोलनाविरोधात दिलेल्या जाहिरातीविषयी माफीनामा लिहून दिला आहे.