पुणे - केंद्र सरकार असंवेदनशील आहे, असे वक्तव्य करत एनआरसी आणि सीएएवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार कोणाचे काहीच ऐकत नसून दडपशाही करत आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या विधानात मोठी तफावत आहे, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा- शिर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दुपारी २ वाजता बैठक
सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पुणे महानगरपालिकेत भेट देत खडकवासला आणि हडपसर मतदारसंघातील विविध समस्यांवर अधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रीय पातळीवरील मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. केंद्र सरकारमध्ये मतभेद असून नेमके निर्णय कोण घेत आहे, सरकार कोण चालवत आहे, असा सवाल त्यांनी केला. देशाच्या एवढ्या मोठ्या निर्णयात दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये एवढे अंतर असेल तर हे चिंताजनक असल्याचीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पुण्यात मनपा आढावा बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील इतर विषयांवर भाष्य केले. शिवसेनेच्या 2014 मधील सरकार स्थापण्याच्या प्रस्तावावर बोलताना या संदर्भात मला काही माहिती नाही. त्यामुळे मी बोलणे योग्य नसल्याचे त्या म्हणाल्या. तर सरकारमधील समन्वय उत्तम असून सर्व कार्यक्रमात सर्वजण एकमेकांना भेटतात. कॅबिनेटमध्ये सर्वात चांगले निर्णय होत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे सर्व निर्णय चांगले होतात. ओव्हर टाईम मंत्रालय काम करत असून सात वाजल्यापासून काम सुरू होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
त्याचबरोबर नाईट लाईफवर कोणताही मतभेद नाही. मंत्री आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांचे विधान हे मॅचिंग होणार आहे. सरकारमध्ये को-ऑर्डिनेशन असल्याचंही त्यांनी म्हटले. तर साई जन्मस्थान वादावर बोलताना साई संस्थान आणि पाथरी या संदर्भात मी फार अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मी फार बोलणे योग्य होणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी बैठक ठेवली आहे. त्यानंतर आपण चर्चा केल्यास संयुक्तिक राहील, असे त्या म्हणाल्या.