पुणे - 'झुलवा' कादंबरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाची ओळख महाराष्ट्राला करून दिली. त्यांच्या अतिशय गाजलेल्या 'झुलवा' कादंबरीमुळे त्यांना 'झुलवाकार' नावाने ओळखले जात होते.
तुपे यांच्या अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले. त्यांच्या 'आंदण' या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. 'काट्यावरची पोट' या आत्मकथेलाही महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. तर झुलवा कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या चिपाड, भसम, माती आणि माणसं, खुळी, नाक्षारी, कळा, कळाशी, इंजाल, झावळ या कादंबऱ्याही विशेष गाजल्या.
मागील अनेक महिन्यांपासून ते पक्षाघातामुळे आजारी होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी जिजा यांचाही काही महिन्यापूर्वीच पक्षाघातामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत.
बंडू तुपे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यात आजार पाठीमागे लागल्यामुळे अडचणीत वाढ झाली होती. त्यांचे हलाखीचे जीवन माध्यमांनी पुढे आणल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली होती.