आळंदी (पुणे) - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या घोषणेमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व मनसे नेते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्यांत बैठका पूर्ण झाल्या असून सर्व जागांवर मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे मनसे नेते राजेंद्र वागसकर, जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणुका लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. मनसेचे महावितरण विरोधातील आंदोलन, औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या हक्कासाठी सुरू केलेला लढा, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उतरलेली मनसे कार्यकर्त्यांची फौज हे मुद्दे ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.
मनसेचा फटका कुणाला
सध्या निवडणुकांमध्ये रिव्हर्स मोडवर असलेले मनसे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळविला आहे. मनसे गाव पातळीवरच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरली तर याचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार की, भाजपला हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
मनसे पॅनल/ स्थानिक युती करून लढणार
पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आळंदीत पार पडली. यावेळी मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, मनोज खराबी, नितीन ताठे, मंगेश सांवत उपस्थित होते. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे पॅनल उभे करणार आहे. जिथे शक्य नाही, तिथे युती करून निवडणूक लढणार असल्याचा निर्णय आज आळंदीत झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीला राज ठाकरेंचा मेळावा
पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात मनसे उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पॅनल, स्थानिक युती याबाबत धोरण ठरवल्यानंतर मनसेचा भव्य मेळावा अध्यक्ष राज ठाकरे घेणार असल्याचे मनसे नेते वागसकर यांनी स्पष्ट केले आहे.