पुणे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजून अपेक्षा आहे की, अजित पवार सोबत येथील म्हणून ते सारखे म्हणत आहेत, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबरच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढील निवडणुका महायुती सोबतच
आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत 26 जानेवारीपर्यंत 2 लाख सभासद करण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायती आणि येणाऱ्या सर्व निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीबरोबरच लढणार आहे, अशी चर्चाही करण्यात आली आहे. तशी चर्चा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर करण्यात येणार आहे, असे यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील वीस-पंचवीस वर्षे कोल्हापूरला परत जात नाहीत. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मी परत कोल्हापूरला जाणार आहे. यावरून विरोधकांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. चंद्रकांत पाटील अजून वीस-पंचवीस वर्षे तरी कोथरूडवरून कोल्हापूरला परत जात नाही. त्यांना दिलेले मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत ते परत जाणार नाहीत, चंद्रकांत पाटील यांना भारतात सर्व ठिकाणी भाजप यावे हे मिशन देण्यात आले आहे, असेही यावेळी रामदास आठवले म्हणाले.
शेतकरी आंदोलन राजकीय झाले
कृषी कायद्यांवरून सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे राजकीय आंदोलन झाले आहे. शेतकरी नेत्यांना कोणीतरी भडकवत आहे. कायदा रद्द होऊ शकत नाही. कायदा रद्द केला तर कोणीही उठेल आणि कायदे रद्द करा, अशी मागणी करेल आणि यामुळे संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो. शेतकरी नेत्यांनी दोन पाऊल मागे यावे आणि सरकारशी चर्चा करून यावर तोडगा काढावा, असेही आठवले यावेळी म्हणाले.
आता नो कोरोना नो कोरोना
कोरोनाच्या सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री यांचे 'गो कोरोना गो' हे बोल चांगलेच गाजले होते. आता त्यांनी 'नो कोरोना नो'चा नारा दिला आहे. सुरुवातीला माझी घोषणा गो कोरोना होती आणि आता तो जात आहे व तो माझ्याकडेही येऊन गेला. मला वाटले नव्हते माझ्याकडे येईल. पण आला, म्हणून आता नो कोरोना नो.
राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा विषय मांडता आला नाही
राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा विषय मांडता आला नाही. म्हणूनच मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. माझी सुरुवातीपासून हीच मागणी होती की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ही मागणी करणारा मी पहिला होतो. सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे, असेही यावेळी आठवले म्हणाले. यावर्षी घरातूनच अभिवादन करा एक जानेवारीला कोरेगाव-भीमा येथे अभिवादनासाठी कोणीही गर्दी करू नये. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वानी यंदा संयम दाखवावा आणि घरातूनच अभिवादन करावे असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.