पुणे - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रविवारी देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणीही घराबाहेर पडू नये म्हणून पोलीस प्रशासन कार्य करत आहेत. पुण्याच्या रस्त्यावरही पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मात्र, अशा परिस्थितीत ज्यांना घर नाही, खायला अन्न नाही, त्यांची परिस्थिती काय आहे, याचा अनुभव पोलिसांना आला आहे.
पुण्यातील गल्ली, बोळ, प्रमुख रस्ते, चौक, हॉटेल सर्व काही बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे ज्यांची घरं नाहीत, जे रस्त्यावर राहतात त्यांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. शहरातील रस्त्यांवर पाणीही मिळणे अवघड झाले आहे. पुण्यातील महर्षीनगर भागात पोलिसांची गाडी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत असताना एका नागरिकाने हात दाखवून गाडी थांबवली आणि आपली कशी गैरसोय होते, हे सांगितले.
हेही वाचा -Janatacurfew : पुण्यातील पर्वती टेकडीवर शुकशुकाट
'माझं कुणीच नाही या दुनियेत, उपासमारीची वेळ आली माझ्यावर.. खायला सुद्धा काहीच नाही माझ्याजवळ. काय करावं टेन्शन आलंय,' अशी कैफियतच त्याने पोलिसांजवळ मांडली. पोलिसांनीही या नागरिकाला धीर देत कुणालातरी पाठवून देतो असे सांगितले. त्यानंतर हा नागरिक निघून गेला.
हेही वाचा -#JantaCurfew पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शुकशुकाट