पुणे - 'कोकणचा राजा' समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी हापूस आंब्याची पुण्यातील पहिली पेटी ही देसाई बंधू यांच्याकडे दाखल झाली आहे. रत्नागिरीतील पावस येथून आंब्याची पुण्यातील पाहिली पेटी बाजारात आली आहे. रत्नागिरीचा हा 4 डझन हापूस आंबा तब्बल 15 हजार रुपयात विक्री करण्यात आला आहे. दरवर्षी मकरसंक्रात नंतर रत्नागिरीतील हापूस हा बाजारात येत असतो. आंब्याचा मौसम सुरू होण्यास अजूनही दोन ते तीन महिने बाकी आहे. मात्र, यंदा वातावरणीय बदलामुळे हा आंबा यंदा लवकर बाजारात दाखल झाला आहे. ( Hapus Mango Arrived in Pune )
यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी -
मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फळांचा राजा आंबा हा म्हणावं तितकं बाजारात आला नसल्याने नागरिकांना एकतर कमी प्रमाणात आणि जास्त दर घेऊन आंबा खरेदी करावा लागला आहे. पण यंदा हंगामाच्या आधीच आंबा हा बाजारात दाखल झाला आहे. यंदा अपेक्षेप्रमाणे जास्तच आंब्याची आवक होणार आहे आणि यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी आहे, अशी माहिती यावेळी देसाई बंधूंचे मालक मंदार देसाई यांनी दिली. ( Demand in Mango in Pune )

हेही वाचा - Ajit Pawar On Narayan Rane : अजित पवारांचा नारायण राणेंना टोला; म्हणाले, "उणीधुणी काढत बसण्यापेक्षा..."
लॉकडाऊन झाला तर 10 ते 15 टक्के दरात परिणाम -
यंदा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून आंब्याला मागणी असून नागरिक आत्तापासूनच आंब्याबाबत विचार करत आहे. गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आंबा खाता आला नाही. मात्र, यंदा ही कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने यंदादेखील आंब्याच्या हंगामावर कोरोनाचे सावट आहे. जर लॉकडाऊन लागला तर आंब्याच्या दारात 10 ते 15 टक्के दरात परिणाम होणार आहे. लॉकडाऊन नाही झालं तर यंदा मात्र जास्त मागणी असेल, असेदेखील देसाई यावेळी म्हणाले.