पुणे - शिरुर तालुक्यातील पिंपळे खालसा गावात परतीच्या पावसामुळे शेवंती फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय पातळीवर नुकसान भरपाईसाठी पंचानामे करण्याचे आदेश निघाले आहेत. मात्र, पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना नुकसानीची तीव्रताच समजत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागु झाल्याने कोणाकडे न्याय मागायचा या संकटात शेतकरी सापडला आहे.
परतीच्या पावसाने पुणे जिल्हासह राज्यात हाहाकार माजवला. पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. शिरुर तालुका प्रामुख्याने शेवंती फुल शेतीसाठी ओळखला जोतो. अतिरिक्त पावसामुळे तालुक्यातील फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पिंपळे खालसा येथील शेतकरी अनिल धुमाळ यांच्या चार एकर असलेली शेवंतीची फुले पावसामुळे गळून पडली आहेत. ऐन तोडणीच्या काळातच पाऊस सुरु झाल्याने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला.
हेही वाचा - पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
शासनाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली जात आहे. मात्र, पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतीबाबत मुलभूत माहितीही नाही. पंचनामे व्यवस्थित केले जात नसल्याने मोठ्या भांडवली खर्चातुन उभारलेल्या पिकांची नुकसान भरपाई कशी मिळणार, असा प्रश्न बाळासाहेब धुमाळ यांनी केला आहे.