बारामती - बारामतीच्या विविध प्रकारच्या विकास कामाची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, मागील चार वर्षांपासून वेळोवेळी मागणी करूनही प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून बारामतीत राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांवर चक्क आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.
'परिसरात नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते'
बारामती नगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक चार रुई, बयाजी नगर येथील ड्रेनेज लाईनचे अपूर्ण काम गेली चार वर्षापासून खंडित आहे. स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी पालिकेला निवेदने देऊनही सदर काम पूर्ण करण्यात आले नाही. या भागात सांडपाणी जागोजागी साचून राहत असल्यामुळे परिसरात नेहमीच दुर्गंधी पसरलेली असते. शिवाय सध्या पावसाचे दिवस असल्याने, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असतानाही पालिका या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्यामुळे उद्विग्न स्थानिक नागरिकांकडून आजपासून बारामती नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
'मेन ड्रेनेज लाईनला जोडली गेली नाही'
गेले २५ वर्षापासून आम्ही बयाजीनगर रूई येथील रहिवाशी असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या ४ वर्षापासून नगरपालिका प्रशासनास पाठपुरवठा करूनही येथील ड्रेनेज लाईन मेन ड्रेनेज लाईनला जोडली गेली नाही. ड्रेनेजचे सांडपाणी थेट घरामधे जाऊ लागले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.