पुणे - भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पुण्याच्या जलवाहिनीवरील मोर्चा स्थगित करुन गावागावांत कुटुंबासह जलसमाधी घेणार असल्याचे सांगितले. आज (रविवार) देवतोरणे, कुदळवाडी गावातील धरणग्रस्त शेतकरी संपुर्ण कुटुंबासह भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात उतरले आहेत. आमच्या हक्काचे पुनर्वसन करा, अन्यथा धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा पवित्रा घेत धरणग्रस्तांनी टोकाचे पाऊल उचलले आहे

गेल्या 30 वर्षापासुन भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी आपल्या हक्काच्या पुनर्वसनासाठी लढ देत आहेत. मात्र, शासकीय पातळीवर बैठकांचा पाऊस होतो. मात्र, या बैठकांमधून कुठलाच ठोस निर्णय होत नाही. शेवटी धरणग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने आता या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी भामा-आसखेड धरणातच कुटुंबासह जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन गावागावांतील धरणग्रस्त शेतकरी कुटुंबासह पाण्यात उतरले आहेत.

मागील वर्षी एका शेतकऱ्याने घेतली होती जलसमाधी
आपल्या हक्काचे पुनर्वसन होत नसल्याने आंदोलनातून एका धरणग्रस्त शेतकऱ्याने मागील वर्षी भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेतली होती. त्यामुळे प्रशासनाने धरणग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन गांभिर्याने घेण्याची गरज आहे.