पुणे - महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आमच्या सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच चर्चा होते. विरोधकांना सत्ता नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील टीका करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
धोरणात्मक निर्णय घेताना राजकारण करायचे नाही -
खेड-शिवापूरचा टोलनाका हा केंद्र शासनाचा आहे. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन काही निर्णय घेतले आहेत. हा टोलनाका पुढे घेण्याची मागणी आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही. धोरणात्मक निर्णय घेत असताना आपल्याला राजकारण करायचे नसल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले.
नितीन गडकरींची घेणार भेट -
राज्यातील रस्त्यांसंदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. बंद पडलेल्या रस्त्यांची कामे सुरु करावीत, त्यासाठी निश्चित कालावधी असावा, अशी मागणी करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची आवश्यकता नाही -
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात आम्ही व्यवस्थित बाजू मांडणार आहोत. मराठा समाजाला राजकीय आरक्षण आवश्यक नसल्याचेही यावेळी चव्हाण यांनी सांगितले. तर, कोरेगाव-भीमाचा तपास एनआयएकडे देण्याला राजकीय वास असल्याची टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली.