परभणी - जिंतूर तालुक्यातील अंगलगाव शिवारात विहिरीजवळ खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांचा पाय घसरून विहिरीत पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आईने देखील विहिरीत उडी मारली. मात्र, तोपर्यंत दोन्ही मुले मरण पावले होते. या धडपडीत मात्र आईची प्रकृती चिंताजनक असून, तिला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. शहरी भागातील लोक घरात बसून आहेत, तर ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंब शेतात वास्तव्यास गेले आहेत. मात्र, शेतामध्ये नानाविध अडचणींचा सामना करत हे कुटुंब राहताना दिसत आहेत. अशाच एका कुटुंबावर संकट कोसळलं. आज (रविवार) दुपारी 12 च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे हद्दीतील अंबरवाडी जवळील आंगलगाव शिवारातील शेतात पवार कुटुंबातील दोन चिमुकले खेळत होते. मात्र, खेळता खेळता विहिरीजवळ गेले आणि ते विहिरीत पाय घसरून पडले. श्रावण कुंडलिक पवार (वय-5) आणि अश्विनी कुंडलिक पवार (वय-4) असे या दोघांचे नाव आहे.
दरम्यान, पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या आईने देखील विहिरीत उडी मारली. मात्र, तोपर्यंत मुलांचा बुडून मृत्यू झाला. आवाज ऐकून लोकांनी धाव घेऊन त्यांनावर काढले. मात्र, आईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना जिंतूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तर बामणी पोलीसांनी घटनास्थळावरून दोन्ही मुलांचे मृतदेह येलदरी उपआरोग्य केंद्र याठिकाणी विच्छेदन करण्यासाठी नेले.