पालघर/नालासोपारा - नायगावच्या चिंचोटी परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याचा गुन्हा शनिवारी वालीव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. अखेर त्या तिन्ही मुली वालीव पोलिसांच्या टीमला तुळजापुरात सापडल्या असून, 36 तासात गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
नायगावच्या चिंचोटी परिसरातील दळवीपाडा येथील भाबीपाडा चाळीत राहणाऱया तीन मैत्रिणी घरातील कोणालाही काहीही न सांगता शुक्रवारी रात्रीच्या सुमारास निघून गेल्या होत्या. या प्रकरणी वालीव पोलिसांनी टीम स्थापन करून मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलींचा तपास करताना एक मोबाईल नंबर पोलिसांना सापडला. त्याच्या डेटावरून पोलिसांनी टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर मुलींना तुळजापूरला सोडल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली.
त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नवले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस हवालदार तोत्रे आणि कोकणी यांची टीम तुळजापूरला गेली होती. सदर मुलींचा फोटो घेऊन प्रत्येक ठिकाणी शोधाशोध सुरू केली. या तिन्ही मैत्रिणी एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती मिळाली. यानंतर सदर ठिकाणी जाऊन तिन्ही मुलींना ताब्यात घेतले आहे.
एका मुलीने घरातून 27 हजार, दुसऱ्या मुलीने 1 लाख तर तिसऱ्या मुलीने 20 हजार अशी रोख रक्कम घेऊन पळाल्या होत्या. लग्न न करता पायावर उभे राहण्यासाठी घरातून जात असल्याची चिठ्ठी लिहून तिन्ही मैत्रिणी निघून गेल्या होत्या. सध्या तिन्ही मुलींना पोलिसांच्या टीमने ताब्यात घेतले असून, मंगळवारी रात्री आल्यानंतर त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले.
हेही वाचा -मी अर्थमंत्रालयाला १२० नेत्यांची यादी पाठवतो; मग बघू कारवाई होते का - संजय राऊत