विरार: वसई विरार महापालिका Vasai Virar Municipality हद्दीतील मनवेल पाडा गावात उभी असलेली बहुतांश अनधिकृत बांधकामे 'राजकीय पाया'वर उभी असल्याने व सोन्याची अंडी देणाऱ्या या बांधकामांवर 'प्रहार' करण्यास पालिकेने हात आखडता घेतला आहे.
राजकीय पाठिंबा विरार-मनवेल पाडा गावातील स्मशानभूमी शेजारी व मागे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. येथील स्थानिक घरत व पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या बांधकामांना 'राजकीय पाठिंबा' आहे. यातील एक बांधकाम प्रभाग-२५ च्या नगरसेविकेच्या पाठिंब्याने इम्तियाज शेख, तर एक बांधकाम 'प्रहार जनशक्ती पक्षाचा पदाधिकारी राजन घरत हा परप्रांतीय व्यक्तीच्या माध्यमातून बांधत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
स्मशानभूमीच्या विकासात आडवी: या व्यक्ती स्वतः पेपरवर नसल्या तरी या बांधकामांना त्यांचा पाठिंबा असल्याने पालिका या बांधकामांवर कारवाई करत नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. ही बांधकामे येथील स्मशानभूमीच्या विकासात आडवी येत आहेत. शिवाय या बांधकामांनी रस्ताही अतिक्रमित केल्याने पालिकेवर नाईलाजास्तव या ठिकाणी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून नाल्यावर स्लॅब टाकून रस्ता बनवण्याची नामुष्की ओढवली आहे.
नालेसफाईत अडथळा येण्याची शक्यता: 2 वर्षे उलटली तरी हा रस्ता पूर्ण होत नसल्याने परिसरात रहिवाशांना स्मशानभूमीतून मार्ग काढत जावे लागत आहे. अनधिकृत बांधकामांकरता पालिकेने लढवलेल्या या अनोख्या शक्कलेमुळे भविष्यात या नालेसफाईत अडथळा येण्याची शक्यता परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान मनवेल पाडा गावातील स्मशानभूमी शेजारी असलेले हे बांधकाम भागीदारांतील 'आर्थिक वादा'त सापडले आहे.
पालिकेकडे धाव: परिणामी या इमारतीत घर घेतलेल्या अनेक ग्राहकांचे पैसे अडकून पडले आहेत. एक घर दोघा- दोघांना विकले गेल्याने अनेकांची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे त्यांनी पालिकेकडे धाव घेतलेली आहे. मात्र त्यानंतरीही वसई- विरार महापालिका प्रभाग 'ब'चे सहाय्यक आयुक्त दयानंद मानकर व कनिष्ठ अभियंता कुणाल घरत यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतलेली नाही.