भोपाळ : भरधाव डंपरनं अनेक वाहनांना चिरडल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तब्बल 5 जणांचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशातील भिंड इथल्या जवाहरपुरा गावाजवळ ही घटना मंगळवारी पहाटे घडली. डंपरनं रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे या वाहनातील 5 जण ठार झाले असून 8 जण गंभीर झाले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनी या अपघातप्रकरणी दु:ख व्यक्त केलं आहे.
लोडींग ऑटोमध्ये बसलेले होते वऱ्हाडी : मंगळवारी पहाटे 5 वाजता भिंडमधील जवाहरपुरा गावाजवळ एका लोडींग ऑटोमध्ये वऱ्हाडी बसले होते. यावेळी भरधाव आलेल्या अनियंत्रित डंपरनं रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या या लोडींग ऑटोला जोरदार धडक दिली. त्यामुळे लोडिंग ऑटोत बसलेले पाच जण जागीच ठार झाले. तर वाहनात बसलेले 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 719 वर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोडिंग ऑटोमध्ये बसलेले सर्व नागरिक लग्न समारंभातून गावाकडं परत येत होते. या ठिकाणी असे अपघात नेहमी घडत असूनही त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचा संताप गावकऱ्यांनी व्यक्त केला.
याच ठिकाणी 24 तासात दुसरा अपघात : भिंडमधील जवाहरपुरा गावाजवळ या ठिकाणी अरुंद रस्ता असल्यानं असे अपघात वारंवार घडतात, असं संतप्त ग्रामस्थांनी सांगितलं. 24 तासांत अपघाताची घडलेली ही दुसरी घटना आहे. रविवारी इथं लग्नातून परतणाऱ्या एका तरुणाला एका ट्रकनं चिरडलं. या घटनेनंतर जवाहरपूर गावातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले.
ग्रामस्थांनी रोखला रस्ता : या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी रस्ता रोखला. ग्रामस्थ पोलीस आणि प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, पोलीस गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोखल्यानं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केले दुःख : या भीषण अपघातात 5 जणांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दुःख व्यक्त केलं. "भिंड जिल्ह्यातील जवाहरपुरा गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. सर्व शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर योग्य उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या विवेकाधीन अनुदानातून प्रत्येकी ४ लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये आणि सामान्य जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये आर्थिक मदत मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा :