पालघर - राष्ट्र सेवा दल पालघर तालुक्यातर्फे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 'एकलव्य गौरव पुरस्कार' देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कार कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. पालघर तालुक्यातील शासकीय अनुदानित विद्यालयातील ५३ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. पालघरच्या मोरे भंडारी समाज भवन सभागृहात रवींद्र वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
ध्येय साध्य करण्यासाठी आपली आवड आणि मर्यादा समजून घेऊन परंपरागत शिक्षण घेण्यापेक्षा जरा हटके मार्ग स्वीकारा. त्याला दृष्टिकोन, कौशल्य आणि मेहनतीची भक्कम जोड देण्याची गरज आहे. असा कानमंत्र व्यवस्थापन गुरू व मनुष्यबळ विकास तज्ज्ञ रवींद्र वाघमारे यांनी एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.
केवळ पुरस्कार देणे एवढेच या कार्यक्रमाचे स्वरूप नसून या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्याबरोबरच, त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास आणि करिअर गाईडन्स संबंधी नियमित कार्यशाळा आयोजित केल्या जात असतात. काही कारणास्तव शिक्षण अर्ध्यावर सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने यापुढे एकलव्य फाउंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे, असे कार्यक्रमाचे व राष्ट्र सेवा दल तालुका अध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी जाहीर केले.
याप्रसंगी राष्ट्रसेवा दल पालघर जिल्हाध्यक्ष जॉन परेरा, राज्य सह सचिव विद्याधर ठाकूर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील, माईंड सॉफ्टवेअर संस्थेचे प्रमुख आभास पाटील, महाराष्ट्र अंनिसचे अण्णा काडल्सकर, निर्भय जन संस्थेचे अध्यक्ष कॅलीस ब्रास यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.