पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वेगवेगळे दोन अपघात घडले आहेत. चारोटी येथे उड्डाण पुलावरून गाडी खाली पडून तर कंटेनरला धडक दिल्याने दोन अपघात घडले आहेत. या दोन अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे.
चारोटी उड्डाण पुलावर अपघात -
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू येथील चारोटी उड्डाण पुलावरून भरधाव दुचाकी पुलाखाली पडून चालकाचा मृत्यू झाला. सिद्धेश परब असे या अपघातात मृताचे नाव असून तो मुंबई, मीरारस्ता येथील रहिवासी आहे.
आंबोली येथे अपघात -
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर आंबोली येथील अहुरा हॉटेल समोर अपघात घडला असून दुचाकी कंटेनरला धडकल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात सफाळे येथील दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. मोहनिष राऊत, असे अपघातात मृत झालेल्याचे नाव असून तो पालघर तालुक्यातील सफाळे- मांडे येथील रहिवासी आहे.
सुट्टीच्या दिवशी महामार्गावर 'धूम'स्टाईलने दुचाकी चालवणे -
मुंबईहून पालघर भागात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक दुचाकीस्वार शनिवार व रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी दुचाकी चालवण्यासाठी येत असतात. मात्र, 'धूम स्टाईल'ने वेगात गाड्या चालवण्याच्या नादात अनेकवेळा अपघात घडतात. असे महामार्गावर अनेक अपघात घडले आहेत.