नाशिक - शेतमालाला जास्त भाव देण्याचं आमिष दाखवत प्ररप्रांतीय शेतकऱ्याला गंडा घातल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. शेतमाल परस्पर विक्री करून आरोपींनी पळ काढला होता. या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्केट यार्ड पंचवटी येथे पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एका चारचाकी गाडीसह 6 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
15 लाखांची फसवणुक
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एका परप्रांतीय शेतकऱ्याला संबंधित आरोपींनी नाशिक मार्केटमध्ये लाल मिरचीला चांगला भाव मिळतो असे सांगितले. शेतकऱ्याने आरोपींवर विश्वास ठेवाला व त्यांना माल दिला. मात्र आरोपींनी शेतकऱ्याची मिरची परस्पर विकून पलायन केले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 15 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेला मोबाईल व ज्या गाड्यांमध्ये माल भरला होता, त्या वाहनचालकांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिकमध्ये सापळा रचला व आरोपींना अटक केली. आरोपींकडून एक चारचाकी आणि 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोनही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून किरीट सोमैयांची बोचरी टीका, म्हणाले...