नाशिक - पंचवटी पोलीस ठाण्यात चक्क आमदार हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कळवणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार हरवल्याची तक्रार त्यांचा मुलगा ऋषिकेश पवार यांनी दाखल केली आहे.
हेही वाचा - दिंडोरी बाजार समितीच्या मार्केटमध्ये कांद्याच्या दरात वाढ
राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरू असतानाच मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
![आमदार हरवल्याची पोलिसांत तक्रार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5159595_thumb.jpg)
हेही वाचा - शुक्रवारपासून मुंबईतच असल्याचा आमदार दिलीप बनकर यांचा खुलासा
दरम्यान, अत्यंत नाट्यमय घडामोडींची सकाळ उजाडल्यानंतर शनिवारचा दिवस संपूर्णपणे राजकीय नाट्याचा ठरला. अजित पवार यांचा भाजपबरोबर सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय वैयक्तित होता, असे शरद पवारांनी जाहीर केले आहे. त्यानंतर त्यांच्याबरोबर कोण आमदार याची चर्चा सुरू झाली. अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या आमदारांपैकी एकेक आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला आले, पण आमदार नितीन पवार समोर आले नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवणचे आमदार नितीन पवार आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना अजित पवार यांनी मुंबईहून चार्टड प्लेनने थेट दिल्लीला पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही आमदारांना राष्ट्रवादीच्या गोटात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. तर आमदार नितीन पवार आणि नरहरी झिरवाळ हे रात्री दहापर्यंत पक्षाच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. माजी खासदार समीर भुजबळ हे त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असून त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.