मुंबई - पवन एक्स्प्रेसच्या दुर्घटनेत एकाही प्रवाशांना मृत्यू झाला नसल्याचा दावा मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केला आहे. याशिवाय दुर्घटनाग्रस्त पवन एक्स्प्रेसमधून प्रवाशांना सुखरूप काढण्यात येत असून, प्रवाशांसाठी खासगी बसेस आणि मुंबईवरून एक रेल्वे गाडी पाठविण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
काय म्हणते रेल्वे ? : मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघालेल्या पवन एक्सप्रेस या गाडीचे आज सुमारे तीन वाजून दहा मिनिटाला जवळपास आठ ते दहा डबे रुळावरून खाली घसरले आहे. पवन एक्सप्रेसही गाडी दरभंगा दिशेने जात होती. इगतपुरी आणि देवलाली दरम्यान ट्रेन क्रमांक 11061 एलटीटी - जयनगर पवन एक्स्प्रेस रुळावरून घसरली आहे.सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह नाशिकरोड स्थानकावर आणण्यात येत आहे. या दुर्घटनेमध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही. या घटनेची माहिती मिळताच मेडिकल स्टाफ इमर्जन्सी स्टाफ आणि बचाव कार्य तात्काळ तिकडे रवाना केलेला आहे. पवन एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक रिकामी गाडी मुंबईवरून पाठवलेली आहे. प्रवाशांना सुखरूप काढण्यासाठी काही खाजगी स्वरूपाच्या बस देखील नियोजन केले आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर पवन एक्स्प्रेसच्या डब्याना बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
आज दोन घटना - मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळीपासून दोन दुर्घटना घडल्या आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. पहिली घटना आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी मध्य रेल्वेच्या उंबरमाळी ते कसारा स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची घडली आहे. या घटनेमुळे कसाराकडे जाणारी लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर दुसरी घटना आज दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी इगतपुरी आणि देवलाली दरम्यान ट्रेन क्रमांक 11061 एलटीटी - जयनगर पवन एक्स्प्रेस रुळावरून घसरली आहे. या दोन्ही घटनेमुळे मध्य रेल्वेचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.