नाशिक - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आल्याने गोरगरीब, मजुरांच्या भुकेचा प्रश्न समोर आला. हातावर पोट असलेल्या नागरिकांची उपासमार होत आहे. मात्र नांदगावकर नागरिकांनी एकत्र येत उपासमार होत असलेल्या नागरिकांसाठी सेंट्रल किचन सुरू केले आहे. या किचनच्या माध्यमातून दररोज १ हजार नागरिकांची भूक भागवण्यात येत आहे.
एक म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, त्याच उक्तीप्रमाणे समस्त नांदगांवकर गेल्या 20 ते 22 दिवसापासून हजार लोकांची भूक भागवत आहेत. यात ना कोणी मोठा न कोणी छोटा. संपूर्ण शहरातील वॉर्डवाईज गोरगरीब आणि गरजू लोकांची यादी तयार करुन त्यांना रोज दोन वेळ ताजे आणि गरमागरम जेवण या सेंट्रल किचनमधून देण्यात येत आहे. देणारे दान देतात आणि सेवा करणारे निशुल्क सेवा करतात. येथे एकूण आठ समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यामार्फत किराणा आणण्यापासून तर गरम जेवण घरपोच पोहोचविण्यापर्यन्त समिती आहे. सर्वजण सकाळी येतात आपले काम करतात. यात कोणीही मोठा नाही व कोणीही छोटा नाही. अन्न तयार झाल्यानंतर पॅकिंग करुन ते घरपोच देण्यात येत आहे.
आम्ही नांदगांवकर म्हणून सर्वजण एकत्रित आले व या उपक्रमास मूर्तिमंत रूप आले. या ठिकाणी आचारी अंबादास शिरसाठ हे निशुल्क रोज 2 वेळेस जेवण बनून देत आहेत. तर अनेक अदृश्य हात या उपक्रमास आपल्या परीने हातभार लावत आहे. संचारबंदी आहे, तोवर हा उपक्रम असाच सुरू राहील. गरजू, होतकरू गोरगरिबांना रोज दोन वेळेचे अन्न देण्याचा माणस आम्ही नांदगांवकर या नात्याने सुरूच राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.