नाशिक- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची चाकू भोकसून वार करून हत्या केल्याची घटना शहरातील गवळीवाडा येथे घडली आहे. ही घटना काल रात्री अकराच्या सुमारास घडली. ताहीर हुसैन अख्तर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.
ताहीर हुसैन अख्तर आणि संशयित आरोपी शेख रफीक शेख इस्माईल उर्फ राजा हे शेजारी राहतात. रात्री अकराच्या सुमारास संशयित रफीक शेख हा त्याची लहान मुलगी सना हिला मारहाण करीत होता. सनाचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज ऐकून ताहीर हुसैन अख्तर व त्याची पत्नी रुखसाना निकहत घराबाहेर आले. तेव्हा आपलेच भांडण सोडविण्यासाठी आले असल्याचा समज झाल्याने, 'तू हमारे झगडे मे गिर मत, तेरा देख' असे शेख रफीक ताहीरला म्हणाला. यावर तुमच्या आरडाओरडीमुळे शेजाऱ्यांना त्रास होतो, असे ताहीरने अख्तरला समजावले. मात्र, शेख रफीक ताहीरलाच शिवीगाळ करू लागला आणि त्याने कमरेतून चाकू काढून ताहीरच्या छातीत खुपसला. या घटनेत ताहीर गंभीर जखमी झाला.
ताहीरला दुखापत झाल्याचे पाहून त्याची पत्नी रुखसाना निकहत त्याला वाचविण्यासाठी गेली. मात्र, शेख रफीकने तिला तोंडावर चापट मारून धक्का दिला व घटनास्थळावरून फरार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या ताहीरला गल्लीतील दोन जणांनी उचलून उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी दरम्यान डॉक्टरांनी ताहीर यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी घटनास्थळावर धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी ताहीरची पत्नी रुखसाना निकहत हिने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताहीरचे रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आल्यावर त्याची शहरातील बडा कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आली आहे.
हेही वाचा- 'झटापटीत घडली लासलगाव जळीत घटना, गुन्ह्याच्या कलमात होणार वाढ'