नाशिक - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनो व्हायरसचा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे. गेल्या 12 ते 15 दिवसापासून सांभाळून ठवलेल्या कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्यावर २ पैसे जास्त मिळतील अशी आशा असताना प्रत्यक्षात मात्र त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. किमान 500 ते जास्तीत जास्त 900 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष पसरला आहे. 1 हजार 500 च्या पुढे भाव मिळाला तरच आमचा उत्पादन खर्च सुटेल असे शेतकरी म्हणत आहे.
केंद्र सरकारने येत्या 15 मार्चपासून निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे व्यापारी चांगला भाव देऊन माल खरेदी करतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे त्यांनी जवळपास 12 ते 15 दिवसापासून कांदा जपून ठेवला होता. त्यानंतर तो विक्रीसाठी बाजारात आणला मात्र, जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनो व्हायरसचा मोठा फटका बसल्याने अनेक देशांत कांदा निर्यात करणे बंद झाले. त्यामुळे आवक वाढली व निर्यात घटली. याचा फटका कांद्याच्या भावाला बसला व कांद्याच्या तुलनेत अत्यंत कमी म्हणजे 450 ते 900 पर्यंत आणि सरासरी 700 रुपयापर्यंत भाव मिळाला. यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सध्या मिळत असलेल्या भावामुळे उत्पादन खर्च देखील सुटत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
निर्यातबंदी जरी उठवली तरी अनेक देशांमध्ये कांद्याची निर्यात बंद आहे. यामुळे आवक वाढली तर मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याला भाव मिळत नाही असे व्यापारी सांगत आहेत. मात्र, किमान 1 हाजर 500 च्या पुढे भाव मिळाला तर आमचा उत्पादन खर्च तरी सुटेल अशी मागणी शेतकरी करत आहेत. संकट अस्मानी असो वा सुल्तानी यात बळीराजाच भरडला जातो.