नाशिक - चांदगिरी शिवारात पुन्हा एक बिबट्या जेरबंद झाला आहे. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या पहाटेच्या सुमारास जेरबंद झाला. आतापर्यंत या दारणाकाठच्या भागात 11 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
दारणाकाठ हा पाणथळ क्षेत्र असल्याने या भागात वन्यप्राण्यांचे वास्तव्य हे मोठ्या प्रमाणात आहे. त्यात बिबट्यांची संख्या अधिक आढळून येते. मागील काही दिवसांपूर्वी चांदगिरी लगतच्या गावांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ले केले, त्यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला. मात्र, या परिसरात सतत बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे आता नागरिकांनी देखील रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. आपल्या लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
के.के. फार्ममध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती व्यवस्थापक नितीन सूर्यवंशी यांनी पोलीस पाटील लखन कटाळे यांना दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी मधुकर गोसावी, गोविंद पंढरे यांनी पिंजरा ताब्यात घेत गंगापूर रोपवाटिकेत नेण्यात आला. चांदगिरी व जाखोरी भागात पकडण्यात आलेला हा सहावा बिबट्या आहे. मात्र, अद्यापही दोन-तीन बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी नागरिक करत असल्याने दहशत कायम आहे.
दारणा काठच्या गावांत अद्यापपर्यंत एकूण अकरा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असले तरीही इतरत्र बिबट्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावलेले आहेत.