येवला (नाशिक) - कोरोनाच्या लढ्यात आता नागरिकांची भूमिका अधिक महत्वाची असणार आहे, त्यासाठी ही लढाई आता लोक चळवळ व्हायला हवी, नागरिकांनीही आता सजग राहुन आपल्या परिसरातील रुग्णांची माहिती संबधित विभागाला दिली पाहिजे. तसेच रेमडेसिवीर हे रुग्ण वाचविण्यासाठीचे अंतिम पर्याय असलेले औषध नाही. त्यामुळे गरज असेल तरच त्याचा वापर करण्यात यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आढावा बैठक -
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत आढावा बैठक पार पडली.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या साखळीमध्ये कितपत फायदा होतोय याचा अंदाज आपण घेतो आहोत. गृहविलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांची व्यवस्था घरी होत नसेल तर त्यांना कोविड सेंटरला हलविण्यात यावे. तसेच त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचीही नियमित तपासणी करण्यात यावी. विलगीकरण सेंटरची आवश्यकता असेल तर सेंटरची संख्या वाढविण्यात यावी. गावपातळीवरही टेस्टिंगची संख्या वाढविण्यात येऊन रुग्णांचे विलगीकरण करण्यात यावे, असेही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.
मृत्यूदर घटविण्यासाठी अथक प्रयत्न करावेत -
ऑक्सिजनची कमतरता असल्याने सिलिंडर नियमित भरून ठेवण्यात यावेत. ऑक्सिजनची क्षमता वाढविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत योग्य नियोजन करण्यात यावे. मृत्यूदर घटविण्यासाठी अथक प्रयत्न करावेत. कंटेंटमेंट झोनमध्ये नियमांचे काटेकोर पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करावे. लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात यावे. मोठ्या बाजारपेठा सुरू राहिल्यास रुग्णसंख्या अधिक वाढत असेल तर किमान आठ दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात याव्यात. त्यांना आवश्यक त्या परवानग्या देण्याबाबत दूरध्वनीद्वारे पणन सचिवांशी चर्चा करून त्यांना निर्देश यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.