नाशिक - बाजार समितीत झेंडूच्या फुलांच्या भावात मोठी घसरण झाली आहे. प्रतिकिलो 5 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कष्टाने पिकविलेल्या फुलांना मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात फुले फेकून दिली.
शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा असताना गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस तसेच ढगाळ वातावरण यामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरेल आहे. शेतकऱ्यांनी दिवाळीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या झेंडूच्या फुलांना कवडीमोल किंमत मिळाली. यामुळे शेतकरी बांधवांनी संतापून आणलेला माल बाजार समितीच्या आवारात फेकून दिला. झेंडूच्या फुलांना जास्त प्रमाणात ओलावा असल्याने ते फुल जास्त काळ टिकणार नाही. या कारणांमुळे अवघा चार ते पाच रुपये भाव मिळाला. सतत सुरू असलेल्या पाऊस आणि दोन दिवसांत पडलेल्या धुक्यामुळे हा सर्व फटका बसला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. एवढ्या मेहनतीने पिकविलेल्या फुलांना कवडीमोल भाव मिळाला. उत्पन्न खर्च देखील निघाला नसल्याने यंदाची दिवाळी शेतकऱ्यांवर संकट घेऊन आली आहे हे मात्र खरे. मात्र, अजुनही पाऊस थांबला नाही, तर शेतात असलेले कांद्याचे पिक देखील हातातून जाईल.
सतत सुरू असलेल्या पावसाने शेतकरी वर्गावर मोठे संकट आले आहे. यामुळे त्यांच्याकडील मका, कांदा ही पीक सडली आहेत. झेंडूच्या फुलांना देखील कवडीमोल भाव मिळाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या यंदाच्या दिवाळीवर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.