नाशिक: सीसीटीव्ही कॅमेरात पकडले जाऊ नये यासाठी कॅमेराला चुना लावत चोरट्यांचा सप्तशृंगी गडावरील दानपेटीवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेच्या गडावर असलेल्या दानपेटीवर चोरट्यांनी अशा प्रकारे डल्ला मारला आहे. अशा प्रकारे चोरी करत चोरट्याने त्यातील पैसे लांबवले नंतर दानपेटीतील काही नोटा जळालेल्या अवस्थेत सापडून आल्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे या बद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

जळालेल्या नोटा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी गडावर एक धक्कादायक बाब समोर आली आहे, सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराला चुना फासत ही चोरी करण्यात आली, दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत देखील मिळून आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही असताना देखील चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

13 फेब्रुवारीची घटना : विशेष म्हणजे 13 फेब्रुवारीला ही चोरीची घटना घडली होती. या घटनेला जवळपास 20 दिवस उलटल्यानंतर सुद्धा अद्याप गुन्हा दाखल करण्यात न आल्याने याबाबत ही आश्चर्य व्यक्त केले जात आहे, मंदिराचे विश्वस्त दीपक पटोदकर यांनी संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीची पत्र दिले आहे.

दबक्या आवाजात चर्चा.. : दानपेटीतून चोरी करणारी व्यक्ती ही मंदिर परिसरातील असल्याची चर्चा आहे,भाविकांनी दानपेटी टाकलेले पैसे हे दानपेटीत लोहचुंबक टाकून काढले जात असावे असा अंदाज येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच दानपेटीत पेटलेली आगरबत्ती पडल्यामुळे नोटा जाळल्या असतील असा अंदाज ही व्यक्त केला जात आहे.
वणी अर्ध शक्तिपीठ : नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन आर्धे शक्तीपीठ झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे.बाकीचे तीन पीठे म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि माहूरची रेणुका माता 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात येथे घडलेल्या या प्रकारामुळे चिंता व्यक्त होत आहे.