नांदेड - नागपूर महामार्गावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून वाहनचालक प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या मार्गाकडे सर्वांनीच पाठ फिरवल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी, वाहन चालकांनी उपस्थित केला.
नांदेड-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर २४ तास हजारो वाहनांची वर्दळ असते. हिंगोली, नागपूर, मुंबई लातूर, औरंगाबाद, हैदराबाद इत्यादी मोठ्या शहरांना जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. जड वाहनांची संख्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये धान्य, खते, सिमेंट, वाळू इत्यादी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश असतो. परिणामी, या महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गेल्या काही दिवसात अनेक अपघात झाले आहेत. अशा या वर्दळीच्या मार्गावर गेल्या काही दिवसापासून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे चालक वैतागले आहेत, अपघातातही वाढ झाली असून संबंधितांनी लक्ष देऊन महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
महामार्गावरील रस्त्याकडे बघताना आसना ते अर्धापूर दरम्यानचा रस्ता आहे कुठे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मोठ-मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. खड्डयांमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग नव्हे तर मृत्यूचा मार्ग बनवण्याची प्रतिक्रिया प्रवाशांमधून होत आहे. अवघ्या एका वर्षापूर्वी या रस्त्याचे काम झाले, मात्र काही महिन्यातच या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
हेही वाचा - शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात काँग्रेस काढणार बैलगाडी लाँगमार्च; अशोक चव्हाण यांची माहिती