नांदेड - भाजप-शिवसेना युतीचे जवळपास ठरल्याचे कानी येत असून पूर्वीचे या मतदारसंघाचे आमदार तथा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जर-तर युती फिसकटली तरच बदल होऊ शकतो. पण, सध्यातरी तसे चित्र दिसत नाही, अशी माहिती सूत्रांकडून आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असून मागच्या वेळच्या उमेदवारानेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे नेमका उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता कायम आहे.
हेही वाचा - आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारी लोक, ही दडपशाही योग्य नाही - नवाब मलिक
२००९ ला अस्तित्वात आलेला नांदेडमधला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २००९ साली काँग्रेसकडून ओमप्रकाश पोकर्णा विजयी झाले होते. त्यावेळी शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी दुसऱया क्रमांकांची मते घेतली होती. त्याच हेमंत पाटील यांनी २०१४ साली अगदी थोड्या फरकाने ही जागा जिंकली. भाजपच्या दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव करत हेमंत पाटील विधानसभेत पोहोचले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी शेजारच्या हिंगोलीमधुन निवडणूक लढवली आणि ते विजयीही झाले. त्यामुळे नांदेड दक्षिणमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील या शिवसेनेच्या उमेदवार राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
नांदेड दक्षिण हा मतदारसंघ म्हणजे अर्ध नांदेड शहर, सिडको, हडको आणि सोनखेडचा काही भाग मिळून बनलेला आहे. या मतदारसंघात मुस्लीम, मराठा आणि दलित मतदार निर्णायक संख्येने आहेत. मागच्या निवडणुकीत एमआयएमने खूप चांगली मते घेतली होती.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा 'प्लान बी' तयार, पोलिसांबरोबर झडप होण्याची भिती ?
त्यामुळे वंचित आघाडीकडुन लढण्यासाठी येथे अनेकजण उत्सुक आहेत. त्यात प्रामुख्याने फारुख अहेमद, मकबुल सलीम हबीब बावेजा, सय्यद मोईन मोईन एमआयएम आल्यामुळे पुर्ण दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे चित्रच बदलण्याची शक्यता आहे.
२०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपसचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे इथुन भाजपकडे उमेदवारी मागणाऱयांची संख्या सर्वाधीक आहे. भाजपकडुन संतुक हंबर्डे, दिलीप कंदकुर्ते, चैतन्य देशमुख, प्रणीता देवरे आदी नाव चर्चेत आहेत. पण युती फिसकटली तरच या उमेदवारांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.
काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसांपासून मुस्लीम उमेदवार द्यावा. अशी मागणी आहे. पण त्यावर काँग्रेस काही निर्णय घेईल अशी सध्यातरी अपेक्षा दिसत नाही. उमेदवारीसाठी अब्दुल सत्तार, अब्दुल शमीम, नरेंद्र चव्हाण, विनय गिरडे पाटील यांनीही दावेदारी केली आहे. पण काँग्रेसचा उमेदवार मागच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेला होता. त्यामुळे काँग्रेसला इथून निवडून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
भाजपला मागच्या निवडणुकीत क्रमांक दोनची मते मिळल्यामुळे पाच वर्षांपासून या मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवला आहे. गत निवडणूकितील उमेदवार तथा भाजप महागराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व माजी महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे भाजपा उमेदवारीत आघाडीवर होते. महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. ऐनवेळी भाजपमध्ये काही इच्छूक उमेदवार बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे कळते.
खासदार हेमंत पाटील यांची पत्नी म्हणून राजश्री पाटील यांची ओळख तर आहेच. पण सामाजिक कार्यशैलीतून एक स्वतःची ओळख राजश्री पाटील यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे स्वतःच्या कुशलतेवरही मतदारसंघात आपली छाप निर्माण केली आहे.
शहर आणि ग्रामीण भाग असलेल्या या मतदारसंघात भाजप, सेना युती, काँगेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित, एमआयएम सह अनेक उमेदवार मैदानात उतरणार असल्यामुळे थोड्या फरकाने विजयाची माळ विजयी उमेदवाराच्या गळ्यात पडणार आहे. या मतदारसंघात नेहमीच सर्वाधीक उमेदवार कायम या मतदारसंघात असतात, त्यामुळे येथली लढाई रंजक असते.
दक्षिण मतदारसंघातील समस्या
शेतकऱयाला सिंचनासाठी पाणी द्यावे म्हणून आपल्या काळात आमदार हेमंत पाटील यांनी मोठी मेहनत घेतली. या मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. आताही हिंगोलीचे खासदार झाले तरी ते इकडे लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे शिवसेनेकडुन ही जागा हिसकावण्यासाठी विरोधकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. हेमंत पाटील यांनी आपल्या कार्यकाळाची छाप टाकण्याचे काम या मतदारसंघात केले, मात्र या मतदारसंघातील समस्या अद्यापही कायम आहेत. नांदेड महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे, मात्र, नांदेडचे अंतर्गत रस्ते हे एखाद्या खेड्याला लाजवतील असे आहेत.
अपुऱया पावसामुळे शहरात पाणी टंचाई आहे, त्याला सर्वस्वी मनपा जवाबदार आहे, पण त्याचा रोष आमदार- खासदारावर जात आहे. उद्योगधंद्याच्या बाबतीत नांदेड नेहमीच मागे पडलेले आहे. एकेकाळी नांदेडचे वैभव असणारी टेक्सटाईल मिल अद्याप बंदच आहे. इतरही छोटे मोठे उद्योग बंद पडलेले आहेत. शिक्षणाच्या बाबतीत नांदेड सुधारले असले तरी इथल्या बेकारांच्या हाताला कामासाठी पुणे मुंबईच गाठावे लागते. रोज पन्नासहुन अधिक खासगी बसेस पुण्याला ये जा करतात. यावरुन या स्थितीचा अंदाज येईल. इतक्या वर्षात साधी धवलक्रांती ही इथ होऊ शकलेली नाही, साध्या दुधाच्या बाबतीत नांदेडकर सोलापुर, नगरवर अवलंबून आहेत. पर्यावरण मंत्र्याकडे नांदेडचे पालकत्व असुनही गोदावरी नदीचे प्रदुषण तसुभरही कमी झालेले नाही. समस्याचे माहेरघर म्हणजे नांदेड शहर आहे, आणि इथले लोक कमालीचे सोशक बनल्यामुळे किमान मतदानातून चमत्कार होईल, अशी आशा आहे.