नांदेड - जिल्ह्यातील शेतकर्यांचे पैसे थकवलेला परभणी जिल्ह्यातील जय महाराष्ट्र शुगर हा कारखाना परस्पर विक्री झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आपले पैसे मिळविण्यासाठी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातील काचा व साहित्याची तोडफोड केली.
२०१५ या वर्षात परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्यांने शेतकऱ्यांच्या ऊसाचे ४ कोटी २२ लाख रूपये अद्यापही दिले नाहीत. या कारखान्यावर अनेक वेळा जप्तीची कार्यवाही होऊन परभणी जिल्हाधिकारी यांनी लिलावही केला. मात्र, अद्याप शेतकर्यांना पैसे मिळालेले नाहीत. नांदेड, पुणे, मुंबईच्या अनेक तक्रारी शेतकर्यांनी केल्या. तरी ही हाती काहीच लागले नाही. नुकताच हा कारखाना परस्पर विक्री केल्याचे कळले. शेतकऱ्यांच्या एकूण दहा कोटी रकमे पैकी केवळ दोन कोटी रुपये तेही दोन वर्षांत शेतकऱ्यांना देण्याचा निवाडा नॅशनल कंपनी लॉ टर्बुनल ने परस्पर केला. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली व घाबरलेल्या शेतकऱ्यांनी प्रल्हाद इंगोले यांच्याकडे धाव घेऊन 'इंगोले' तुम्ही पुढाकार घ्या आम्ही सगळे जण तुमच्या मागे राहू पण आमचे थकलेले पैसे मिळून द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
त्यामुळे आज साखर सहसंचालक कार्यालयात शेतकरी गेले असता संबधित कार्यालयात कुणीही गांभीर्याने घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी खुर्चीला निवेदन चिटकवले. व साखर संचालक कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. रात्री उशिरापर्यंत सर्व शेतकरी कार्यालयातच बसून होते. यावेळी शेतकऱ्यांनी यंदा एकरकमी एफआरपी न दिलेल्या थकीत रकमेवर व्याज आकारणी सुरू करा, महाराष्ट्र शुगर परभणी या कारखान्यांकडील थकीत बाकी शेतकऱ्यांना मिळेपर्यंत ट्वेंटी शुगर कारखान्याला दिलेला गाळप परवाना रद्द करा, महाराष्ट्र शुगर कारखान्याच्या बाबतीत एनसीएलटी च्या निर्णयाविरोधात आयुक्त कार्यालयाने याचिका दाखल करावी, २०१४-१५ चे विलंब व्याज न देणाऱ्या कारखान्यावर आरआरसीची कार्यवाही करावी, शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आयुक्त कार्यालय पुणे यांच्या लेखी आश्वासनाशिवाय आजचे आंदोलन संपणार नाही. वेळप्रसंगी येथेच मुक्काम करू असा शेतकऱ्यांचा निर्धार असल्याचे प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनात शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, संतोष कदम, सुदाम चवरे यांच्यासह नांदेड ,परभणी, हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.