नांदेड - केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार हरभरा विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील तीन यंत्रणांकडे सहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. परंतु, बाजारात हरभऱ्याला पाच हजारापर्यंत दर आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी सावध झाले आहेत. यामुळे शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी अद्याप हरभरा आणलेला नाही, अशी माहिती जिल्हा पणन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात 29 ठिकाणी खरेदी केंद्रे
शेतकऱ्यांना बाजारात शेतीमालाचा दर चांगला मिळावा, यासाठी केंद्र शासन किमान हमी दरानुसार नाफेडद्वारे शेतमाल खरेदी करते. जिल्ह्यात किमान हमी दरानुसार हरभरा खरेदी करण्याची प्रक्रिया १५ फेब्रुवारीपासून सुरू झाली. यामध्ये महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तसेच महा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अशा एकूण २९ ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत.
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नोंदणी...!
खरेदीपूर्वी शेतकऱ्यांना पीक पेरा नोंद असलेला सातबारा, आधार, बँक पासबुकची झेरॉक्स खरेदी केंद्रावर नेऊन नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यात दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या १२ केंद्रांत तीन हजार १७७ , विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या चार केंद्रांत ९४५, तर महा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या १८ केंद्रांत एक हजार ८२९ अशा एकूण पाच हजार ९ ५१ शेतकऱ्यांनी आजपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली.
दर वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा...!
खरेदीसाठी यंत्रणा तयार बाजारात ४८०० ते ४९०० पर्यंत दर आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आणखी दर वाढतील, या आशेने हरभरा विक्रीसाठी केंद्रावर आणला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. दरामुळे माल आला नाही, तरी भविष्यात बाजारात दर पडले, तर खरेदीसाठी यंत्रणा तयार आहे, अशी माहिती जिल्हा पणन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.