नांदेड- जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजता पावसाने सुरुवात केली आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांच्या हातून हे पीक जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा- 'आता ‘मातोश्री’ वरुन आदेश येत नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात'
जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सूर्यदर्शन दुर्मीळ झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा, गहू व करडई या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. अगोदरच पिके पिवळी पडून करपत आहेत. त्यातच गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण असून पावसाळ्याप्रमाणे आभाळ भरून आले आहे. नांदेड शहरासह अनेक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाने जसा खरीप हंगाम हातचा हिरावून घेतला तसाच रब्बी हंगामही हिरावून घेतो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.