नांदेड - पावसाळा सुरू झाला तरीही खरीप हंगामासाठी लागणारे पीककर्ज वाटप ठप्प आहे. त्यामुळे, कर्जाचे वाटप तात्काळ करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी भाजपच्यावतीने नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आज आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने कर्जमाफीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे .
लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून असल्याने परिणामी तो व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागत असल्याची तक्रार भाजपने केली आहे . या आंदोलनात भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले, महानगर सरचिटणीस व्यंकट मोकले, अॅड. दिलीप ठाकूर, मिलिंद देशमुख , नवलकिशोर पोकर्णा, सुशिल चव्हाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विविध तालुक्यात भाजपच्यावतीने बँकांना निवेदन -
कर्जमुक्तीसाठी राज्यभर झालेल्या आंदोलनात नांदेड शहरासह विविध तालुक्यातही आंदोलन व बँकांना निवेदन देण्यात आले. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी अनेक तालुक्यांत हजेरी लावली. अर्धापूर येथेही आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष अँड. किशोर देशमुख, भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, सुधाकर कदम, विलास साबळे, डॉ. लक्ष्मण इंगोले यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.