नागपूर - प्रत्येक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. नागपूरलासुद्धा हा प्रश्न भेडसावत आहे. नागपूरला पाणीपुरवठा करणारी तीन जलाशये आहेत. पण, या तिन्ही जलाशयांतील पाणी १० जूनपर्यंतच पुरेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्याविषयी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यात पेंच तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी या जलसाठ्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. सध्या या तिन्ही जलाशयात ६७ मिमी. क्यूब एवढेच पाणी शिल्लक आहे. एकट्या नागपूर शहरात दैनंदिन व्यवहारासाठी २.७ मिमी क्यूब एवढे पाणी लागते. त्यापैकी १.३ मिमी क्यूब पाणी खापरखेडा आणि कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला विजनिर्मितीसाठी तसेच, नगरपालिकांना पुरविण्यात येते.
पाणी संकटापासून वाचण्यासाठी पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे, सांडपाण्याचे योग्य नियोजन आदींबाबत प्रशासनाकडून जागृती करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जनजागृती मोहिम राबवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.