नागपूर Nagpur Gowari Martyrs Day : आज २९ वा 'हुतात्मा गोवारी स्मृती दिवस' आहे. 1994 साली आपल्या न्याय्य मागण्यांसाठी गोवारी समजाचा भव्य मोर्चा नागपूरच्या विधिमंडळावर धडकला. मोर्चात हजारो गोवारी समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये उडालेल्या संघर्षात गोवारी समाजातील 114 गोवारी बांधव हुतात्मे झाले होते. त्या घटनेचा आज २९वा स्मृती दिवस आहे. मात्र, या २९ व्या वर्षीदेखील गोवारी समाज (Gowari Community) आजही आपल्या अस्तित्वासाठी सातत्याने लढतोय. पण या समाजाकडे आपुलकीने बघण्याचा दृष्टिकोन एकाही नेत्यांमध्ये नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.

व्यवस्थेविरुद्ध चीड व राज्यकर्त्यांबद्दल असंतोष : गोवारी समाजाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मात्र, 29 वर्षांनंतरही गोवारी समाजाच्या मागण्या जशाच्या-तशा असल्यानं, गोवारी समाजात या व्यवस्थेविरुद्ध स्वाभाविक चीड आणि राज्यकर्त्यांबद्दल असंतोष असल्याचं दिसून येत आहे. गोवारी समाजासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या 114 हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि मानवंदना देण्यासाठी दरवर्षी हजारो गोवारी बांधव नागपूरच्या 'शहीद गोवारी स्मारक' येथे येतात.

29 वर्षांपूर्वी काय घडले होते : 1994चा तो दिवस होता. त्यादिवशी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु होतं. त्यावेळी हजारो गोवारी समाज बांधव बायका-मुलं आणि लहान मुलाबाळांच्या माता आपल्या मागण्यांसाठी विधिमंडळावर मोर्चा घेऊन आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार आणि आदिवासी विभागाचे मंत्री मधुकर पिचड यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेण्यासाठी यावं, या मागणीवर मोर्चेकरी अडून बसल्याने तणाव दर मिनिटागणिक वाढत होता. त्याचवेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता. त्यामुळं मोर्चेकरी सैरभैर होऊन पळत असताना एका पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदुकीतून गोळी सुटली आणि गोंधळ आणखीच वाढला. चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्या घटनेला 29 वर्ष पूर्ण झाली असली तरी ती जखम मात्र अद्याप भळभळतीच आहे.

राजकारण्यांनी आमचा वापर केला : गेल्या 29 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी गोवारी समाजाचा उपयोग केवळ आणि केवळ राजकारणाकरिता केला असल्याचा आरोप, गोवारी समाजातील मंडळींनी केला आहे. आपले राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सर्वच राजकारण्यांनी आश्वासनांच्या खैराती वाटल्या असल्याचं म्हणत त्यांनी आपल्या रोषाला वाट मोकळी करुन दिली आहे.

हेही वाचा -