नागपूर - शहरातील सुयोननगर येथे आगळ्या वेगळ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी यावर्षी आयोजकांनी कलम 370 ची थीम घेऊन दहीहंडीचे आयोजन केले होते.
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सगळीकडे दहीहंडीची धूम असताना नागपुरातही ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जम्मू काश्मीरमधील कलम 370 केंद्र सरकारने रद्दबातल केले. याच थीमवर नागपूरच्या सुयोगनगर मित्र मंडळातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरच्या सुयोगनगर उद्यानजवळ आयोजित या दहीहंडी उत्सवात परिसरातील अबाल-वृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 5 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात महत्वाचा दिवस असून काश्मीरमधून कलम 370 रद्दबातल केल्याने काय फरक पडणार याविषयी माहिती देणारे फलक येथे लावण्यात आले होते.