नागपूर- महिन्यापूर्वी सत्तेत आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. यामध्ये अनिल देशमुख यांची वर्णी लागली आहे. तब्बल ४ वेळा मंत्रिपदाची शपथ घेणारे देशमुख यावेळी देखील पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
हेही वाचा- औरंगाबादला दोन मंत्रिपदे; अब्दुल सत्तार अन् संदीपान भुमरेंची वर्णी
काटोल विधासभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून १९७० पासून केली. १९९२ मध्ये पहिल्यांदा पंचायत समितिची निवडणूक जिंकून सभापती झालेल्या अनिल देशमुखांनी १९९५ मध्ये विधासभेसाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. युती सरकारला समर्थन देत ते मंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. अनिल देशमुख आतापर्यंत १८ वर्षे मंत्री राहिले आहेत.
अनिल देशमुख- काटोल मतदार संघ, वय - ६९ वर्ष, शिक्षण - पदव्युत्तर, १९९२ मध्ये नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष, १९९५ मध्ये अपक्ष निवडणूक लढवून विजयी, युती सरकारमध्ये शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, सांस्कृतिक खात्याचे मंत्रिपद, १९९९ मध्ये दुसऱ्यांदा आमदार (NCP), राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन विभागाचे मंत्रिपद, २००४ मध्ये तिसऱ्यांदा आमदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रिपद, २००९ मध्ये चौथ्यांदा आमदार, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रिपद, २०१४ मध्ये पराभव, २०१९ मध्ये पुन्हा आमदार.
विकासाचे मुद्दे आणि जनतेची अपेक्षा
काटोल विधानसभा क्षेत्र हे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे. ग्रामीण बहुल भाग असल्याने इतर पिकांसोबत धानाची शेती आणि संत्राच्या शेती मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी आणि मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सत्तेत येण्याआधी आमदारांनी जे आश्वासन दिली त्याची पूर्तता महत्वाची. ओल्या दुष्काळातील पीक नुकसान भरपाई. कर्जमाफी आणि पिकांना दिड पट हमीभाव या अपेक्षा शेतकरी बांधवांच्या आहेत. तर काही क्षेत्रात औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगारांच्या मागण्या या भागातील जनतेच्या आहेत.