मुंबई - अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघांचे निलंबन तर दोन परिचारकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली.
![health minister tweet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-rajeshtope-7209727_08112021213001_0811f_1636387201_777.jpg)
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबरला सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये या ठिकाणी असलेल्या सतरा रुग्णांपैकी यातील किमान 11 रुग्ण दगावले होते. या आयसीयू वार्डात 17 कोरोना रुग्ण होते.
![health minister tweet](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-rajeshtope-7209727_08112021213001_0811f_1636387201_52.jpg)
कारवाई करण्यात आलेल्यांची नावे -
1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा - निलंबित
2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3. डॉ. विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5. आस्मा शेख -स्टाफ नर्स - सेवा समाप्त
6. चन्ना आनंत - स्टाफ नर्स- सेवा समाप्त
मनसे, राष्ट्रवादीकडूनच पोखरणा यांच्या निलंबनाची मागणी -
अहमदनगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत अकरा लोकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. यासंदर्भात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देत दुर्घटना झालेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सध्या कार्यरत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्याशी एकूण आग प्रकरणासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी पाहणीदरम्यान अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी एकूणच उपलब्ध मिळालेली माहिती, सिव्हिल सर्जन यांच्याशी झालेली चर्चा या अनुषंगाने असे दिसून येत आहे की, फायर ऑडिटबाबत माहिती असतानाही याठिकाणी असणाऱ्या तांत्रिक दुरुस्त्या या केल्या गेल्या नाहीत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेली तांत्रिक आणि बांधकामाची जबाबदारी संबंधित इंजिनिअर यांनी पार पाडल्याचे दिसून येत नसल्याचे प्राथमिक दिसत आहे. त्या अनुषंगाने आता जर या दुर्घटनेची चौकशी होत असताना जिल्हा रुग्णालयाचे विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक हेच त्या पदावर कार्यरत असतील तर ही चौकशी निर्धोक होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना सर्वप्रथम त्या पदावरून हटवण्यात आलं पाहिजे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे ही संबंधित इंजिनियर असतील त्यांनाही तत्काळ निलंबित केले पाहिजे. अन्यथा या प्रकारच्या घटना यापुढेही होतील आणि त्या घटनेला नेमके जबाबदार कोण? हे पुढे येणार नाही. त्यामुळे समितीने चौकशी करण्यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित इंजिनियर यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना या चौकशीपासून दूर ठेवले पाहिजे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना केली.