मुंबई - तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे. परंतु, व्यवसायात काहीतरी वेगळेपण असले तरच व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, असा मार्गदर्शनपर सल्ला कामत हॉटेल्सचे संस्थापक विठ्ठल कामत आणि आणि नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन कामत या प्रसिद्ध उद्योजकांनी दिला आहे. सारस्वत चेंबर तर्फे वडाळा येथील द्वारकानाथ भवनात या उद्योजकांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रघुनंदन कामत यांच्या नॅचरल आईस्क्रीमच्या जगभरात 140 शाखा आहेत. 1984 साली रघुनंदन एका कंपनीतून विभक्त झाले. तेव्हा त्यांनी स्वतःचे आईस्क्रीम पार्लर सुरू केले होते. आज ते यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. तर, इडली-सांबरपासून सुरू केलेला व्यवसाय विठ्ठल कामत यांनी आज फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत पोहोचवला आहे. त्यांचे हॉटेल्स जगभरात आहेत. व्यवसायांप्रमाणेच त्यांची भाषेवरसुद्धा पकड आहे. त्यांना 14 भाषा अवगत आहेत. अशा या दोन यशस्वी उद्योजकांचा प्रवास तरुणांना कळावा व त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी व्यवसाय सुरु करावा, या हेतूने सारस्वत चेंबर कडून हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा - 'व्हर्जिन'चे रिचर्ड ब्रॅन्सन उद्धव ठाकरेंच्या भेटीला, 'हायपरलूप'बाबत चर्चा
यावेळी, या उद्योजकांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. रघुनंदन कामत यांनी व्यवसायातील वेगळेपणामुळेच आपण यशस्वी होऊ शकलो, अशी भावना व्यक्त केली. याशिवाय, व्यवसायात दुरदृष्टी ठेऊन अपयशाला न घाबरता काम करण्याचा सल्ला विठ्ठल कामत यांनी यावेळी नवउद्योजकांना दिला.