मुंबई - महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे एका महिलेचा हात पिरगळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर महापौरांची प्रचंड बदनामी झाली. मात्र, महापौरांनी आपला फक्त हात झटकला असून विनयभंग केला नसल्याचा त्या महिलेचा व्हीडोओ प्रसारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये महापौरांची आणि माझी बदनामी थांबवा, असे आवाहन देखील त्या महिलेने केले आहे. मात्र, इतक्या दिवसांनी या महिलेचा व्हिडिओ प्रसारित केल्याने पुन्हा राजकीय चर्चेला वेग आला आहे.
सांताक्रूझ वाकोला येथे पाणी साचल्याने माय-लेकाचा शॉक लागून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी महापौर विश्वनाथ महाडेश्वर दुर्घटनास्थळाला भेट द्यायला गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी विशेष करून महिलांनी महापौरांना याठिकाणी काल पाणी भरले होते. तुम्ही कुठे होतात? असा प्रश्न उपस्थित करत मृतांच्या घरी जाण्यापासून महापौरांना रोखण्यात आले. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर संतापलेल्या महापौरांनी एका महिलेचा हात पकडून पिरगळून मला ओळखत नाहीस का? असा शब्द प्रयोग करून धमकी दिली. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मीडियामध्ये बातम्या प्रसारित झाल्या. काही मिडियामधून महापौरांनी विनयभंग केल्याचेही प्रसारित करण्यात आले. यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच राणीबागेतील महापौर बंगल्यावर जाऊन आंदोलनही केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरांचा राजीनामा मागण्यात आला. या प्रकरणामुळे महापौरांची प्रचंड बदनामी झाली. मातोश्रीचीही डोकेदुखी वाढली. वांद्रे पूर्व येथून विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महापौरांना आपला राजकीय अस्त झाल्याचे समजून आले होते.
घटनेला ८ ते १० दिवस झाल्यावर त्या महिलेचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये तिने महापौरांना महिलांनी अडवल्याने माझा हात झटकल्याचे मान्य केले आहे. महापौरांनी माझा हात पिरगळाला नाही. माझा विनयभंग केला नाही. या प्रकरणामुळे महापौरांची आणि माझी खूप बदनामी झाली असल्याचे या महिलेने म्हटले आहे. मी कोणत्या राजकीय पक्षाची कार्यकर्ती नाही. माझा काही राजकीय पक्ष फायदा उचलत असल्याचेही या महिलेने म्हटले आहे. या प्रकरणानंतर आठ ते दहा दिवसानंतर या महिलेचा व्हिडीओ प्रकाशित केल्याने याबाबत पुन्हा राजकीय चर्चेला वेग आला आहे.