मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची पेरणी करण्यासाठी २६ जानेवारीपासून नांदेड जिल्ह्यातून फकिरा संदेश यात्रेला सुरुवात झाली होती. ही यात्रा उद्या (१२ मार्च) मुंबईत धडकणार आहे. लालसेना या संघटनेकडून ही फकिरा संदेश यात्रा काढण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या टेंभुर्णी येथील शहीद पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाला अभिवादन करून २६ जानेवारीला फकिरा संदेश यात्रेची सुरुवात झाली. फकिरा संदेश यात्रेची सांगता १२ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे होणार आहे. यात्रेचा पहिला टप्पा टेंभुर्णी ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव हा पूर्ण झाला आहे. आता वाटेगाव ते पुणे, मुंबई असा दुसरा टप्पा सुरू झाला असून, १२ मार्च रोजी ही यात्रा मुंबईत धडकणार आहे. मुंबईतील २० हून अधिक वस्त्यांमध्ये ही यात्रा फिरणार असून ठिकठिकाणी शाहिरी जलसे, प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती फकिरा संदेश यात्रेचे आयोजक कॉम्रेड गणपत भिसे यांनी सांगितली.
आम्ही या यात्रेच्या निमित्ताने १ मार्च २०२० रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे फकिरा राणोजी साठे या वीर योद्ध्याची पहिली जयंती फकिरा मांगाच्या समाधीजवळ साजरी केली. शोषणमुक्तीची सशक्त चळवळ उभी करण्यासाठी आम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या 'फकीरा' कादंबरीतून 'फकिरा' बाहेर काढावा लागणार आहे. मांग जातीला देशोधडीला लावणाऱ्या इंग्रजांच्या जुलमी कायद्याच्या विरोधात फकिरा लढला आहे. आपल्याला काळ्या इंग्रजाकडून होणाऱ्या जुलमाच्या विरोधात लढायचे असल्याचे यावेळी कॉ. गणपत भिसे म्हणाले.