मुंबई - दिवाळीच्या मुहुर्तावर मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोरोना लसीचा दोन मात्रा घेणाऱ्या प्रवाशांना लोकलचे दैनंदिन तिकीट मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लसवंतांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाकडून रेल्वेला पत्र पाठविण्यात आले आहे.
लसवंतांना मोठा दिलासा -
गेल्या वर्षी कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. नंतर 15 जून 2020पासून रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरू केली होती. आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकल प्रवास करण्यासाठी लसवंतांना फक्त मासिक पास देण्यात येत होते. प्रवाशांना लोकलचे दैनंदिन तिकीट मिळत नव्हते. यामुळे लसवंत प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत होते. मात्र, आता राज्य सरकारने लसवंतांना लोकलचे दैनंदिन तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधित पत्रसुद्धा राज्य सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा - राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांची समीर वानखेडेंच्या घरी भेट
शंभर टक्के फेऱ्या होणार -
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य रेल्वेवरून 1 हजार 702 आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 304 लोकल फेऱ्या धावत आहेत. एकूण 95.70 टक्के लोकल फेऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून धावत आहेत. तर, आता मध्य रेल्वेवरून 1 हजार 774 फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवरून 1 हजार 367 फेऱ्या अशा 100 टक्के फेऱ्या धावणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रवाशांनाच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.