मुंबई - राज्यात सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत राज्यात २५ हजार इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. तेथे मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा ऐच्छिक ठेवली जाते. अशा या सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे सक्तीचे केले जाणार असल्याची माहिती उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. त्यासाठी कायदाही करणार असल्याचे देसाई म्हणाले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात देसाई बोलत होते. यावेळी त्यांनी ते म्हणाले की, इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे. म्हणून मराठी भाषा शिक्षण अनिवार्य केले जावे. हे राज्य सरकारचे मत आहे. मात्र, मताला किंमत नसल्याने आता तसा कायदा केला जाणार आहे. सर्व बोर्डाच्या शाळांना मराठी शिकवावे लागेल. येत्या अधिवेशनात कायदा मंजूर केला जाईल. 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी हा कायदा मंजूर केला जाईल असेही देसाई म्हणाले.
महाविद्यालयीन तरुणांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रंगवैखारी उपक्रम राबविला जात आहे. सध्या मुंबई, पुण्यामध्ये हा उपक्रम सुरू असून नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येईल असेही ते म्हणाले.